मुलुंड–विक्रोळी नाल्यांमधून ठाणे खाडीत जाणारा कचरा रोखण्याची गरज पर्यावरणप्रेमी नंदकुमार पवार यांची निवेदनाद्वारे मागणी!
प्रतिनिधी
मुंबई :- स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणाबाबत गंभीर बाब समोर आली आहे. मुलुंड पूर्व येथील नानेपाडा परिसरातून पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेला नाला शहरातील मोठ्या प्रमाणातील घनकचरा थेट ठाणे खाडीत जाऊन मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कचरा पुढे Thane Creek Flamingo Sanctuary या जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त रामसर (Ramsar) स्थळातील कांदळवन तसेच माशांच्या प्रजनन क्षेत्रांवर साचत असून तेथील जैवविविधतेला गंभीर 
धोका निर्माण होत आहे.या संदर्भात २०२४ मध्ये माननीय राष्ट्रीय हरित लवाद (NGT), पुणे येथे याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने न्यायालयाने सुमारे १० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिले होते. या निधीतून मुलुंड ते विक्रोळी दरम्यान असलेल्या उघड्या नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर घनकचरा अडवण्यासाठी ‘ट्रॅश बूम’ (जाळ्या) बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते, जेणेकरून हा कचरा थेट ठाणे खाडीत जाण्यापासून रोखता येईल.मात्र प्रत्यक्षात सहा ठिकाणी जाळ्या बसविण्याचे नियोजन असताना आजतागायत केवळ दोन ठिकाणीच ट्रॅश बूम बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित ठिकाणी अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने स्थानिक पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उर्वरित ठिकाणी तातडीने ट्रॅश बूम बसवून नाल्यांमधून ठाणे खाडीत जाणारा घनकचरा रोखावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी, समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी केली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













