बाळसई गावाच्या प्रवेशद्वारच्या वायु प्रदूषणावर रोहा तहसील कार्यालयाचे अजूनही मौन
प्रतिनिधि समीर बामुगडे
रायगड (रोहा) :- बाळसई गावाच्या प्रवेशद्वारावरील वायु प्रदूषण बाबतीत रोहा तहसील कार्यालयाने अजूनही कोणतीच कार्यवाही न केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.बाळसई गावात प्रवेश करतानाच दत्त मंदिर आणि शिवपुतळ्या समोरच गट्टू बनवण्याचा व्यवसाय सुरु आहे.त्यामुळे सिमेंट-वाळूचा मोठा त्रास या परिसरात 
दिसून येतो आहे. धुळीने सगळा परिसर माखलेला असतो. बाळसई गावातील नागरिकांना त्या ठिकाणी होणा-या धूळीचा सामना करावा लागतो.खरे तर हा प्रकार ग्रामस्थ तसेच हमरस्त्या वरून जाणाऱ्या – येणाऱ्यांच्या आरोग्याला हानिकारक आहे.निसर्गसाथी या निसर्ग रक्षण व पर्यावरण कार्यासाठी कार्यरत संस्थेने याबाबतीत रोहा तहसील कार्यालयात तक्रार केली आहे. मात्र दोन आठवड्यात अजूनही याविषयी प्रशासन जागृत झाल्याचे दिसत नाही.हा व्यवसाय ‘त्या’ जागेवरुन स्थलांतरित करावा अशी मागणी जोर धरत आहे.ग्रामस्थांच्या बोलण्यातून हे दुखणं म्हणजे आपल्याच गावच्या बोरी आणि आपल्याच गावच्या बाभळी असं झालं आहे.अनेक सरकारी योजना आणि उद्योग जिथे ग्रामस्थ मंडळींचा आग्रह असेल तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीत शक्य नसेल तर अमान्य करते. मग या ठिकाणी कोणत्या अर्थपूर्ण मार्गाने हा त्रासदायक उद्योग सुरु आहे ? अशी शंका देखील व्यक्त होते.रोहा तहसील कार्यालयाने अगोदरच याची दखल घेणे गरजेचे आहे. आता तक्रार होऊन देखील काही कार्यवाही होत नसल्याने वेगळा अर्थ निघतो आहे.सुप्रीम पेट्रो केमिकल कंपनी याच मार्गांवर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी या मार्गाने जात असतात. नागोठणे रिलायन्स किंवा रोह्याकडे याच रस्त्याने सगळे जा ये करतात. मग असा भर रस्त्यावर असलेला वायु प्रदूषण करणारा उद्योग कसा कुणाला दिसत नाही? हा देखील कळीचा मुद्दा आहे.खरेतर असले उद्योग आडमार्गाला प्रदूषणाचा कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी असणे गरजेचे आहे. मात्र साधे भोळे ग्रामस्थ यांना कायदे माहिती नसल्याने त्यांना मुकी बिचारी कुणी हाका असा अनुभव मिळत आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













