आठवणींनी फुललेले क्षण : अंबुलगा (बु.) शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा थाटात संपन्न
प्रतिनिधी
लातूर (अंबुलगा (बु.) :- आठवणींचे गंध घेऊन, मैत्रीच्या मोगऱ्याने फुललेली शाळा” – अशीच एक अविस्मरणीय अनुभूती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबुलगा (बु.) येथे २० एप्रिल २०२५ रोजी अनुभवली गेली. माजी विद्यार्थ्यांचा बहुप्रतीक्षित स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात, आनंदात आणि प्रेमळ वातावरणात पार पडला.ज्या शाळेत कधी हातात पाटी घेऊन शिकलो, जिथे शाळेच्या घंटा आवाजाने उड्या मारत मैदानात धावलो, त्या लाडक्या शाळेच्या अंगणात पुन्हा एकदा पाय ठेवताना प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकले. सन १९८४-८५ साली शिक्षण घेतलेले ३२ माजी विद्यार्थी आणि ०६ विद्यार्थिनी, वयाची पन्नाशी पार करूनही, त्या दिवशी पुन्हा बालक झाले होते.कार्यक्रमाची भव्य रूपरेषा सकाळी १० वाजता चहापानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.१०.३० वाजता दीपप्रज्वलनाने सभागृहात तेजाचा वर्षाव झाला आणि मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचा अधिकृत आरंभ झाला.११ वाजता विविध मनोगतांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.”त्या काळात शाळा कमी, पण माया अधिक होती,” असे अनेकांनी भरल्या गळ्याने सांगितले.१२ वाजता दुपारच्या जेवणाचा स्वाद घेताना सर्वांनी बालपणीच्या किस्स्यांची, गमतीजमतींची मेजवानी उलगडली.२ वाजता एकत्र छायाचित्र घेत, त्या सुंदर क्षणांना इतिहासात कायमचे जपले गेले.२.३० नंतर पुन्हा गप्पांचा फड रंगत गेला आणि नवीन उपक्रमांची स्वप्ने रंगवली गेली.मा. श्री शिवशंकर मिरगाळे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भव्य स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा असलेले त्रिशला पाटील, तानाजी कांबळे, संजय गोमसाळे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशात शिक्षकवृंदांचा देखील मोलाचा वाटा होता.या स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमचे सन्माननीय शिक्षकवृंद जी. जी. ब्रह्मवाले सर, लोहिया सर, पी. एस. बिराजदार सर, पी. टी. हार्डे सर, नागमोडे सर, माने सर, सत्यवती मॅडम उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह आणि नव्या आठवणींचा जाज्वल्य प्रकाश पेरला.आठवणींना मिळाले नवसंजीवन”ही शाळा म्हणजे आमचं दुसरं घर होतं,” “आज पुन्हा या वाड्यातून शाळेच्या गंधाने मन गंधाळलं,” अशा भावना प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होत्या. वाढत्या वयाची, जबाबदाऱ्यांची धावपळ थोडीशी विसरून, त्या लहानशा क्षणात प्रत्येकाने पुन्हा आपले हरवलेले बालपण शोधले.सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमताने ठरवले की, दर दोन वर्षांनी असाच एक स्नेहमेळावा आयोजित करून, आपल्या गोड आठवणींना आणि आपसातील प्रेमबंधनाला जिवंत ठेवायचे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













