राज्यात एलपीजी गॅसचा संभाव्य तुटवडा होऊ शकतो- राज्यमंत्री योगेश कदम
प्रतिनिधी
मुंबई :- इराण–इस्रायल संघर्षाचे पडसाद आता राज्यासह देशात उमटू लागले असून त्याचा परिणाम एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठी
असलेल्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट तसेच फूड इंडस्ट्रीवर होण्याची शक्यता आहे.मुंबईत गॅसच्या तुटवड्याचा परिणाम दिसू लागला असून सुमारे २० टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवसही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईतील जवळपास ५० टक्के हॉटेल्स बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा तसेच गॅसचा योग्य व मर्यादित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.सरकारकडून एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













