खेड शहर मराठा समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

रत्नागिरी/खेड :- खेड शहर मराठा समाजाच्या वतीने नुकताच मराठा समाजातील यू.पी.एस.सी, एम.बी.बी.एस, बी.ए.एम.एस, सी.ए., सर्व पदवीधारक, इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण, शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव/ शुभेच्छा समारंभ खेडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती राजश्री मोरे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत व समाजाचे अध्यक्ष श्री.शरदराव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली श्री.केशवराव जगतराव भोसले सभागृह मराठा भवन, छत्रपती शिवाजी महाराज नगर, खेड येथे नुकताच संपन्न झाला.

मराठा भवन समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वल करून तसेच शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर गेले काही वर्ष प्रलंबित असणाऱ्या खेड शहर मराठा समाज या संस्थेची शासन दरबारी रीतसर, अद्ययावत नोंदणी पूर्ण करून नोंदणीकृत संस्था म्हणून कार्यरत असलेल्या खेड शहर मराठा समाज संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

जीवनात पुढे जाण्याचे ध्येय ठेवणारा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी होतो त्याला परिस्थितीचा अडथळा होत नाही असा मूलमंत्र उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मा.श्रीम.राजश्री मोरे मॅडम यांनी आपल्या मौलिक मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिला. तसेच मनात जिद्द व प्रयत्नात सातत्य ठेवत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे. आपले आई वडील यांनी आपल्यासाठी केलेल्या संघर्षाचा विसर पडणार नाही याबाबत आपण कायम जागरूक राहिले पाहिजे. विशेषतः मुलींनी व्यवसायिक शिक्षणादरम्यान येणाऱ्या समस्यांवर जिद्दीने व सामोपचाराने मात करत यश मिळविले पाहिजे. प्रचंड स्पर्धा असणाऱ्या या डिजिटल युगात जीवनात यशस्वी होण्यासाठी सोशल मीडियाने जरी माहिती मिळत असली तरी सोबत वाचनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यशस्वितेसाठी वाचन आवश्यक दिशादर्शक ठरते तेव्हा त्याचे महत्व वेळीच ओळखून ते कृतीत आणा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी विद्यार्थ्यांनी पुढील दिशा व शैक्षणिक क्षेत्रात निवड करत असताना त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हाने येतात ? ती पार करण्यासाठी आपण काय करणे गरजेचे आहे ? कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे. याबाबत आय.सी.एस. कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर श्री.चंद्रशेखर साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
व्यावसायिक शिक्षणाकडे वळताना कशाप्रकारे तयारी करणे अपेक्षित आहे. वैद्यकीय, इंजीनियरिंग या क्षेत्राकडे वळताना JEE, NEET या प्रवेशपरीक्षाची तयारी अशी करावी, कोणती दिशा योग्य आहे . त्यासाठी आपण कशाप्रकारे तयारी करून त्यात यशस्वी होऊ शकतो. येथील स्थानिक शैक्षणिक परिस्थितीचा कशाप्रकारे उपयोग करून घ्यावा याबाबत डॉक्टर श्री.अजितराव भोसले यांनी गुणवंत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जीवनातील पुढील शैक्षणिक दिशा ठरवताना आपल्याला येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केवळ समाजातील नव्हे तर तालुक्यातील तुमच्या सर्वच मित्र मैत्रिणींनाही यापुढेही दिशादर्शक, मोफत आवश्यक मार्गदर्शन व मदत यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू. अशी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. चंद्रशेखर साळुंखे व डॉ.श्री.अजितराव भोसले यांनी विद्यार्थ्याना ग्वाही दिली.
JEE या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेला कु.श्रेयस अनिल पाटील यांने या परीक्षेसाठी केलेली तयारी याबाबत स्वतःचे अनुभव कथन केले. तसेच कु. आर्यन उदय भोसले यांने उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले.
समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत व आर्थिक गरज असणारा कु. ऋषी माने याला प्रांताधिकारी श्रीम. राजश्री मोरे मॅडम यांचे हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.
या प्रसंगी पत्रकार श्री.किशोर साळवी, ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भरत मोरे सर, श्री.भालचंद्र उर्फ नंदू साळवी, श्री. रोहन विचारे, श्री.प्रशांत सावंत, श्री.संदीप शेठ नायकवडी, श्री. सुहास भोसले, श्री.दिपक नलावडे, श्री.अंकुश विचारे, श्री.बाजीराव रणदिवे, श्री.राजू आंब्रे, डॉ.निलेश भोसले, श्री.अनिल मोरे सर, श्री.अमोल दळवी, श्री. मोहन पाटील, श्री.संजय कडू, श्रीमती शुभांगी जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व गुणवंत विद्यार्थी चे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री शरद भोसले सर यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













