दापोडे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न!
प्रतिनिधी
ठाणे (भिवंडी) :- भिवंडी तालुक्यातील दापोडे येथे शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न झाले. उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात नागरिकांना विविध दाखले व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.या वेळी बोलताना उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी सांगितले की, शालेय विद्यार्थ्यांचे दाखले असोत किंवा शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांसारखे महत्त्वाचे दस्तऐवज असोत, सर्व प्रकारचे दाखले नागरिकांना या अभियानांतर्गत मिळावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठीच शासन 
आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती श्री. कुंदन तुळशीराम पाटील यांनी आपल्या मनोगतात तहसीलदार व सर्व महसूल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. पूर्वी एका दाखल्यासाठी नागरिकांना अनेक दिवस तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असत; मात्र आता शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना तत्काळ सेवा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. दापोडे गावात नागरिकांच्या सोयीसाठी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले. तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्री. अभिजीत खोले यांनी केले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे दाखले थेट शाळेतच उपलब्ध करून देण्याबाबत शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जे नागरिक सकाळी उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी दुपारी आले तरी त्यांची सर्व कामे पूर्ण करून दिली जातील, अशीही त्यांनी घोषणा केली.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. भरत पांडुरंग पाटील, दापोडे ग्रामपंचायतीच्या प्रशासक श्रीमती संध्या गणेश पाटील, राहणाळ ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच श्री. प्रताप मारुती पाटील, दै. स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, पूर्णा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. हरिदास पाटील, उपअधीक्षक भूमि अभिलेख श्री. सचिन हमजादे, माजी उपसरपंच दापोडे श्री. प्रभाकर मनिलाल पाटील, गावदेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. कामिनी पाटील, अप्पर मंडल अधिकारी श्री. राजेंद्र वंजारी, खारबाव मंडलाधिकारी श्री. सुधाकर कामडी तसेच सर्व सजांचे तलाठी, महसूल अधिकारी, कर्मचारी, आजी-माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













