शिवभक्त सुखद राणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
प्रतिनिधी महेश स्वामी
रायगड (रोहा – कोलाड) बालपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीदायक इतिहासाने प्रेरित झालेले श्री. राणे यांनी रबर टेक्नॉलॉजीसारख्या वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले. नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, रोहा, पॅरिस, अहमदाबाद आदी ठिकाणी त्यांनी औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल केली. मात्र या व्यस्त जीवनातही १९८५ पासून त्यांनी महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या इतिहासाचा तळमळीने अभ्यास सुरू ठेवला.गड-किल्ल्यांच्या अभ्यासातून मिळालेली माहिती त्यांनी विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंकांतून प्रसिद्ध केली. यासोबतच व्याख्याने देत तरुण पिढीशी सतत संपर्क ठेवून दुर्ग अभ्यास व दुर्ग संवर्धनासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन २००२ साली डहाणूकर पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेत २०११ साली रायगड गुणवंत पुरस्कार, तर २०१९ साली रायगड 
जिल्हा परिषदेकडून रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.आजतागायत सुमारे ७०० किल्ल्यांची भटकंती करून त्यावर सखोल इतिहास अभ्यास व लेखन करत “इये देशीचे दुर्ग” ही ग्रंथाली निर्माण केली आहे. या ग्रंथांमुळे अनेक नवतरुणांना इतिहासाची दिशा व चैतन्य मिळाले आहे.अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला. सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी, विविध गडांवरील दुर्ग संवर्धन करणारे मावळे, डॉक्टर, वकील, महिलावर्ग तसेच लहान मुलांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.शिवरायांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि गड-किल्ल्यांच्या इतिहासासाठी आयुष्य वेचणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने उपस्थितांमध्ये प्रेरणा व अभिमानाची भावना निर्माण केली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













