ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडण्याची चिन्हे
प्रतिनिधी
विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून संधी मिळणार?
रायगड :- पंचायत समित्या आणि महापालिकांस्या चाललेल्या निवडणुकांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. येत्या फेब्रुवारीत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार आहेत. त्यांच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर व्यक्त होत आहे.निवडणुका लांबल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीची शक्यता आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात जिल्हाभरात ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपणार आहे. तेथे निर्धारित वेळेत नवे सदस्य निवडून येण्यासाठी डिसेंबर महिन्यातच ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते पण सध्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. या सर्व निवडणुका ३१ जानेवारी अखेर संपविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या दृष्टीने हा कालावधी अपुरा आहे. रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी आयोगाची अवस्था झाली आहे. त्यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे नवे ओझे अंगावर घेण्याची आयोगाची परिस्थिती नाही हे स्पष्ट दिसत आहे. या स्थितीत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणान्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. तेथील राजकीय संघर्ष अटीतटीचा असतो. त्यामुळे त्यांच्या निवडणुकाही लक्ष्यवेधी ठरतात. सरपंच निवडही थेट मतदारांतून होणार असल्याने निवडणुका कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत.
सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
दोन महिन्यांत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीत इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. विशेषत थेट सरपंचपदावा अनेकांचा डोळा असून प्रचाराला सुरुवात केली आहे.
…तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका दिवाळीतच
फेब्रुवारीतील निवडणुका लांबल्यास त्या आगामी किमान सहा ते आठ महिने घेता येणार नाहीत. मार्चपासून शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे निवडणुकीसाठी शाळांतील वर्गखोल्या आणि शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे निवडणुका पावसाळा संपल्यावर म्हणजे दसरा-दिवाळीतच घ्याव्या लागणार आहेत
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













